रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्याच्या माहितीसाठी आणि सुरक्षेसाठी महत्वाची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर रात्रीच्या सुमारास प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना 4 ते 5 जणांच्या टोळीकडून लुटण्याचा प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. रस्ता खराब असलेल्या ठिकाणी वाहने थांबवून टोळीकडून लुटण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही वाहनचालकांचे म्हणणे आहे. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळवरून माणगावकडे येत असताना सोमवारी रात्री 10 च्या सुमारास गडप गावच्या हद्दीत 4 जणांच्या टोळीने वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला. एका वाहनातून 2 महिला व 2 पुरूष प्रवास करत होते. त्यांची गाडी अडवून लुटण्याचा प्रयत्न झाला, मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वाहन वेगाने हाकल्याने त्यांच्या तावडीतून सहीसलामत सुटले.