पाचल:-शाळेत सरस्वती पूजनाच्या निमित्ताने गरबा खेळत असताना चक्कर आल्याने एका सोळा वर्षीय तरूणीचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील पाचल येथे घडली आहे. वैष्णवी प्रकाश माने (16, रा. आजिवली) असे या तरूणीचे नाव असून अत्यंत हुशार आणि मनमिळावू विद्यार्थीची अशी दुदैवी एक्झिट सर्वांना चटका लावणारी ठरली आहे.
आजिवली धनगरवाडी येथील वैष्णवी पकाश माने ही पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयतील सायन्समधून इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. नवरात्र उत्सवानिमित्त शाळेत सरस्वती पूजन कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती पूजनावेळी शाळेतील विद्यार्थी गरबा नृत्य करत होते. यावेळी वैष्णवीचा देखील सहभाग होता. गरबा खेळत असताना वैष्णवी हिला अचानक चक्कर आली आणि ती खाली बसली. त्यानंतर वैष्णवी हिला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले, मात्र तत्पूर्वी तीची पाणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे पाचलसह आजिवली परिसरात शोककळा पसरली आहे.
अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या वैष्णवीने आजिवली हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत 86 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला होता. दहावीनंतर इंजिनिअरिंग करण्याचे तीचे स्वप्न होते. याकरीता तीला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशनही मिळालं होतं. मात्र आई-वडिलांची आठवण येत असल्याने तीने ऍडमिशन मिळालेलं हायस्कूल सोडून पुन्हा पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. हायस्कूलप्रमाणे या महाविद्यालयातही वैष्णवी अभ्यासातील गुणवत्ता, उत्तम वक्तत्व शैली, खेळातील आवड यामुळे शाळेतील शिक्षकांची आवडती विद्यार्थीनी होती. नुकत्याच ओणी हायकूलमध्ये झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी हिने भाग घेत प्रथम क्रमांक पटकाविला होता.
पाचल येथील महाविद्यालयात शिकणारी वैष्णवी ही आजीवली धनगर वाडीतून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करून एसटी स्टॉपपर्यंत येत होती. नंतर त्यापुढे दररोज एक तास एसटीने प्रवास करून पाचल येथे हायस्कूलमध्ये जात होती. शिक्षणासाठी वैष्णवीची अशी धडपड सुरू असताना नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते. गरबा खेळताना चक्कर आल्याचे निमित्त झाले आणि हुशार, होतकरू वैष्णवीला काळाने हिरावून नेले. या घटनेने पाचल हायस्कूलसह पाचल व आजिवली गावात हळहळ व्यक्त होत आहे.