व्हॉट्सॲपद्वारे पदोन्नतीचे आदेश, ‘तेरी भी चूप मेरी भी चूप ‘चा संदेश
रत्नागिरी:-जिल्हा परिषदेत बदल्या करून देणारे एक रॅकेट पुन्हा एकदा सक्रीय झाले असून आचारसंहितेत या बदल्या अडकू नयेत म्हणून कोणतेही ‘खाडे’ न करता आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधी घाईघाईत पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्याप्रमाणात देवाणघेवाण झाली असून काहींना व्हॉट्सऍपद्वारे पदोन्नतीचे आदेश पाठवून याबाबत कोठेही चर्चा करू नका असे सांगण्यात आल्याने जिल्हा परिषदेत त्याबाबतची जोरदार चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत ४ दिवसांपूर्वी एका शिक्षण विस्तार अधिकार्याचा प्रताप उघडकीस आला. महिलांशी अश्लिल संवाद साधणार्या या अधिकार्याला चांगलाच धडा मिळाला. आता तर नवे रॅकेट पुढे आले आहे. बदल्या कोणत्याही असोत त्यामध्ये ३ बडे अधिकारी आणि त्यांचे काही चमचे हे लगेच सक्रीय होतात. मग ती पदोन्नती असो अथवा बदली असो अशावेळी कोणतेही निकष त्यांना लागू होत नाहीत.
निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपल्याला अडचणी निर्माण होतील, यासाठी घाईघाईने पदोन्नत्यांची यादी तयार करण्यात आली. जवळजवळ ६ वरिष्ठ सहाय्यक लिपिकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती जाहीर झाली. पदोन्नती जाही झाली तरी त्याचे आदेश काढायचे होते. त्यासाठी आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधी घाईघाईने तसे आदेश काढण्यात आले.
खरंतर एखाद्याला पदोन्नती देताना त्याठिकाणचे पद रिक्त आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. दापोलीत कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारी महिला काही दिवसांनी निवृत्त होणार आहे. मात्र त्या निवृत्त होण्यापुर्वीच वरिष्ठ सहाय्यक लिपीक यांना त्यांच्या जागी पदोन्नती जाहीर करण्यात आली. कनिष्ठ प्रशासन अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्याठिकाणी नियुक्ती देणे गरजेचे होते. मात्र तसे न करता आचारसंहिता अडचणीची ठरू नये म्हणून घाईघाईत मागच्या तारखेने आदेश काढून त्यांना पुन्हा पदोन्नतीचे आदेश व्हॉट्सऍपने काढण्यात आले व याबाबत कुठलीही चर्चा करू नका, असे मेसेजदेखील टाकल्याचे बोलले जात आहे.
या सार्या प्रकारात गेले ३ वर्ष एका विधवा महिला कर्मचार्यावर अन्याय केला आहे. ५३ वर्ष वयाचा शासनादेश असताना त्या शासन आदेशानुसार या महिलेला बदली मिळू शकते. मात्र या महिलेच्या अर्जाकडे सातत्याने दुर्लक्ष करून मलिदा मिळेल अशा काही अर्जांचा विचार करून घाईघाईत त्यांना पदोन्नती देण्यात आली. काहींचे ‘खाडे’ झाले ते खाडे वेगळ्या पद्धतीने भरून काढण्यात आले, अशी चर्चा आता जिल्हा परिषदेत जोरदार सुरू आहे.
जिल्हा परिषदेत काही कर्मचारी एकेका विभागात १०-१५ वर्ष ठाण मांडून बसले आहेत. कारण मोठी सेटींग असल्याने या कर्मचार्यांना बदलण्यासाठी कोणी पुढे येत नाही. मग तो शिक्षण विभाग असो किंवा सामान्य प्रसासन विभाग असो सगळीकडे सेटींग करणारे रॅकेट सक्रीय आहे आणि हे अधिकारी कोण? कर्मचारी कोण? याची माहिती वरिष्ठांना आहे. मलिदा खाणारे बोके वर्षानुवर्षे ठाण मांडून बसल्याने सर्वसामान्या कर्मचार्यांना मात्र न्यायापासून वंचित रहावे लागत आहे.