चिपळूण:-काही दिवसांपूर्वी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या कामाच्या वेळेत 2 तासांनी वाढ होणार आहे. तसेच अन्य कामांचा बोजाही टाकला जाण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
अंगणवाडी सेविकांना दैनंदिन अहवालाबरोबरच स्तनदा, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांचीही काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे कामांचा व्याप लक्षात घेता पूर्वी असलेले मानधन वाढवावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कर्मचारी संघटना कायम लढा देत आहेत. या लढ्याला काही दिवसांपूर्वी काही अंशी यश आले. यातूनच मानधन वाढ झाली.
मात्र नोव्हेंबर माहिण्याचे मानधन जोपर्यंत हातात मिळत नाही तोपर्यंत ते किती वाढले, हे स्पष्ट होणार नाही. असे असताना आता मानधन वाढले म्हणून कामाचे 2 तास वाढणार आहेत. तसेच आरोग्य विभागाची काही कामे त्या पूर्वीपासून करीत असल्या तरी आता ती अधिकृतपणे त्यात वाढ करून कामे सोपवली जाण्याची शक्यताही आहे. मात्र याचा सविस्तर आदेश संबंधित विभागाला अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे मानधन वाढले असले तरी त्या बदल्यात कामाचे तास व अन्य कामे वाढवली जात असल्याने झालेली वाढ काय कामाची असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.