नवी दिल्ली : कांद्यात दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारनं प्लॅन केला आहे. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडने खरेदी केलेला सुमारे 840 मेट्रिक टन कांदा बुधवारी दिल्लीत पोहोचला आहे. याआधीही भारतीय रेल्वेच्या विशेष कांदा एक्स्प्रेसने 1600 मेट्रिक टन कांदा दिल्ली-एनसीआरला पाठवला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये रेल्वेने कांदा पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे.
केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठेतील एकूण उपलब्धता वाढवण्यासाठी, बहुतांश कांदा आझादपूर मंडईत विक्रीसाठी पाठवला जाईल. कांद्याचा काही भाग किरकोळ विक्रीसाठी 35 रुपये प्रतिकिलो या दराने ठेवला जाईल. विविध प्रदेशात कांदा वेळेवर, विश्वासार्ह आणि किफायतशीर पोहोचवण्यासाठी प्रथमच रेल्वेद्वारे कांद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत आहे.
नाशिकहून चेन्नईला रेल्वेद्वारे पाठवला कांदा
नाफेडने यापूर्वी नाशिकहून 840 मेट्रिक टन कांदा रेल्वेद्वारे पाठवला होता, जो 26 ऑक्टोबर रोजी चेन्नईला पोहोचला होता. नाशिक ते गुवाहाटी असा आणखी एक रेल्वे रेक बुधवारी सकाळी 840 मेट्रिक टन कांद्यासह नाशिकहून निघाला. किंमत स्थिरीकरणासाठी सरकारने यावर्षी 4.7 लाख टन रब्बी कांदा खरेदी केला होता. 5 सप्टेंबरपासून देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये किरकोळ विक्रीद्वारे कांदा 35 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत नाशिकसह अन्य स्रोत केंद्रातून 1.40 लाख टनांहून अधिक कांदा बफरमधील ग्राहक केंद्रांवर पाठवण्यात आला आहे.