रत्नागिरी:-आचारसंहिता काळात भरारी पथक व स्थिर सर्वेक्षण पथकांनी जफ्त केलेली रक्कम पडताळणी करुन परत करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे आणि जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद्र बिरादार यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. आचारसंहिता कालावधीत संयुक्तीक कारणाखेरीज विहित मर्यादेच्या वर रोख रक्कम बाळगण्यास प्रतिबंध असल्याने अशी रक्कम भरारीपथक व स्थिर सर्व्हेक्षण पथक यांना आढळून आल्यास ती जफ्त करण्यात येते.
या कार्यवाहीमुळे सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रक्कम बाळगण्याची पडताळणी करण्यासाठी व आवश्यक जप्त केलेली रक्कम परत करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी पूजार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुर्वे व जिल्हा कोषागार अधिकारी बिरादार यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.
नागरिकांना आचारसंहिता कालावधीत जप्त केलेली रक्कम परत घेण्यासाठी रक्कम बाळगण्याबाबत आवश्यक कागदपत्रे, दस्तऐवज, पुराव्यासह वरील समितीकडे संपर्क (भ्रमणध्वनी क्र. 7588588950) करावा, असे आवाहन समिती प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी केले आहे.