रत्नागिरी:-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उमेदवारी न मिळाल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांनी अपक्ष म्हणून रत्नागिरी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.
मात्र ते अर्ज मागे घेऊन पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारात सहभागी होतील, असा विश्वास पक्षाचे पदाधिकारी डॉ. प्रतीक झिमण यांनी व्यक्त केला.
सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे. रत्नागिरीमध्ये आता पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महायुतीचे उमेदवार म्हणून बाळ माने मशाल या निशाणीवर निवडणूक लढत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीसाठी उदय बने यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. उद्धव ठाकरे यापुढे त्यांचा यथोचित सन्मान नक्कीच करतील. उमेदवार निवडीनंतर नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत दोन उदय एकत्र येतील, तसेच उदय बने यांच्यावर पक्षात अन्याय झाल्याचे प्रतिस्पर्धी उमेदवाराने म्हटले. डॉ. झिमण यांनी उदय सामंत यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, वास्ताविक त्यांचा प्रवास राष्ट्रवादी, शिवसेना नंतर शिंदे गट असा राहिलेला आहे. त्यांनी जेव्हा पक्षात प्रवेश केला, तेव्हासुद्धा शिवसैनिकांवर अन्यायच झाला होता. मात्र शिवसैनिक नेहमीच पक्षादेश मानतो, मातोश्रीचा आदेश प्रत्येक शिवसैनिकांना शिरसावंद्य असतो. त्याच्याच प्रत्यय म्हणून ४०००, ८००० या मताधिक्याने निवडून येणारे ते उमेदवार शिवसेनेतील प्रवेशानंतर ४५ हजाराहून अधिक मताधिक्याने निवडून आले. ही शिवसैनिकांची ताकद आहे. तेव्हासुद्धा पक्षाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांना पक्षातर्फे एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र त्यांच्याऐवजी यांना उमेदवारी मिळाली. तेव्हासुद्धा त्यांच्यावर अन्यायच झाला होता, परंतु पक्षादेश मानत सर्व शिवसैनिकांनी मोठ्या फरकानी निवडून आणले. त्याच शिवसैनिकांचे खच्चीकरण करण्याचे काम शिवसेनेच्या १० वर्षांच्या कालावधीत करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते शिंदे गटात सामील झाले. केवळ मंत्रिपद, त्यातून पैसा मिळवणे व मिळालेल्या पैशातून परत सत्ता मिळवणे, प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी यांना पैशाचे आमिष दाखवून इडी आदी यंत्रणांचे भय दाखवून आपले काम करण्यास भाग पाडणे हेच गेली २० वर्षे चालू आहे.
डॉ. झिमण म्हणाले, निकृष्ट रस्ते, अपघात, बेरोजगारी, कंपन्या बंद, पाणी प्रश्न, सांडपाण्याचा प्रश्न, घनकचरा प्रकल्प, तरुण पिढीची व्यसनाधीनता, ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक यांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करता येईल. पण ती होत नाही. ‘त्या’ पत्रकार परिषदेमध्ये उदय बने यांच्या बाबतीत खूप काळजी असल्याचे दाखवण्यात येत होते. परंतु उदय बने यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचे कोणी प्रयत्न केले, हेदेखील शोधले पाहिजे. ज्या उद्धव साहेबांनी पक्षाची उमेदवारी, पक्षाचे उपनेतेपद, म्हाडाचे अध्यक्षपद, पुन्हा उमेदवारी, मंत्रिपद असे सर्व काही दिले त्याच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत नेहमीच टीका करताना ते हिरीरीने अग्रभागी असतात. जे देशाचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे झाले नाहीत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तरी प्रामाणिक राहतील का, हा खरा प्रश्न आहे, असेही डॉ. झिमण म्हणाले.
उदय बने यांना शाखाप्रमुख, उपतालुकाप्रख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख अशी पक्षाची अनेक पदे त्याचबरोबर ५ वेळा जिल्हा परिषद सदस्य, सभापती, उपाध्यक्ष अशी पदे देऊन सन्मानित केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनावाढीसाठी उदय बने यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, हे कोणीही नाकारु शकत नाही. उद्धव ठाकरे यापुढेदेखील त्यांचा यथोचित सन्मान नक्कीच करतील. उदय बने अर्ज फॉर्म मागे घेऊन शिवसेना पक्षप्रमुख यांनी दिलेला उमेदवार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतील. परंतु त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्याचे काम विरोधक करत आहेत, हे दुर्दैवी आहे. सर्व शिवसैनिक व मायबाप जनतेने या सर्व बाबींचा विचार करून मशाल या निशाणी समोरचे बटण दाबून न्याय द्यावा, असे आवाहनही डॉ. झिमण यांनी केले.