रत्नागिरी:- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १९ हजार ४६२ लाभार्थी उद्दिष्टापैकी १९ हजार ३२५ लाभार्थ्यांना घरकुलांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात १ जानेवारी २०२५ पासून महाआवास अभियान सुरू झाले असून, याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील २० लाख लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर केले जाणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिह्यातील १९ हजार ३२५ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेश पत्र प्रदान करण्याची कार्यवाही सुरू आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार करत आहे. राज्य शासनाने उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच हप्ते वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात घरकुलाच्या कोणत्याही लाभार्थ्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
घरकुल योजनेच्या लाभामध्ये ५० हजार रुपयांनी वाढ करून ती आता २ लाख १० हजार करण्यात आली आहे. भूमीहीन लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी मदत करण्यात येत आहे. जमीन खरेदीच्या लाभामध्येही ५० हजार रुपयांची वाढ करून ती १ लाख रुपये करण्यात आली आहे.